लेखिका: माधवी, संस्थापक – जीविषा
यावत्भूमंडलात्धत्तेसशैलवनकाननम्
तावत्तिष्ठन्तिमेदित्न्यांसंततिपुत्रपौतृकी
देहन्तेपरमंस्थानम्यतसुरैरपिदुर्लभम्
प्राप्नोतिपुरुषोनित्यंमहामायाप्रसादतः।।
अर्थ: जो पर्यंत पृथ्वीवर पर्वत, वने आणि सरोवरे आहेत, तो पर्यंत जीवांची उत्पत्ती होऊन ते सुखाने जगतील , ज्यांना ही गोष्ट, उमजेल त्यांना महामायेच्या (निसर्ग देवता) प्रासादात देवांनाही दुर्लभ असे परमस्थान प्राप्त होईल.
या श्लोकाचा मला उमजलेला अर्थ असा की, निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गपूरक जीवनशैली आपण जितकी आत्मसात करू तितके आपले आयुष्य स्वर्गीय बनत जाईल. पृथ्वीला आपली गरज नसून आपल्यालाच पृथ्वीची नितांत गरज आहे.
जीविषा या संस्थेचा उदयसुद्धा ह्याच विचारांतून झाला.
जीविषा म्हणजे ‘जगण्याची इच्छा’ .आज आपण आपल्या इच्छा-आकांक्षांखातर संपूर्ण जीवनसृष्टीचा ऱ्हास करीत आहोत. गरज आहे हा दृष्टीकोन बदलुन शाश्वत विकासाकडे वळण्याची ,आणि याच दिशेने टाकलेले पाऊल म्हणजे ‘जीविषा’.
शाश्वत विकास म्हणजे भावी पिढ्यांच्या गरजांचा विचार करून केलेला विकास, आज सद्य परिस्थितीत आपण करत असलेला विकास हा विरुद्ध दिशेने असून समाजातील अनेक घटकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे शाश्वत विकासासाठी सार्वभौम विचार प्रणालीचा अवलंब करणे गरजेचे आहे. शाश्वत जीवनशैली म्हणजे फक्त पर्यावरणपूरक जीवनशैली नसुन, समाजातील ,परिसंस्थेतील प्रत्येक घटकाचा विचार करून विविधता जपून, समानता प्रस्थापित करणे होय.त्यामुळे शाश्वत जीवनशैली बरोबरच सामाजिक न्याय हे मूल्य आलेच.
जीविषाच्या माध्यमातून शाश्वत विकासाकडे आम्ही वाटचाल सुरू केली आहे. आमची कर्मभूमी, प्रयोगभूमी आहे – कुडाळ , सिंधुदुर्ग येथील व्ही. आर. सन्स इंजिनियर्स ही फॅक्टरी. आश्चर्य वाटतयं ना? शाश्वत, निसर्गपूरक जीवनशैली आणि ती जगतोय चक्क एका फॅक्टरीमध्ये. आपल्याला प्रत्येकवेळी निसर्गाच्या जवळ जायला एखाद्या घनदाट जंगलामध्ये जाऊन राहावे लागते असे नाही. निसर्ग कुठेही फुलवता येतो, शहरातील गच्चीत, गावाकडच्या बागेत किंवा एखाद्या फॅक्टरीत. कारण निसर्ग सर्वत्र आहे, आपल्याला शोधायची आहे ती दृष्टी – निसर्गाला ओळखायची , स्वतःमध्ये पाहण्याची.
रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे,’ जी व्यक्ती आपल्याला झाडाची सावली मिळणार नाही हे माहित असूनही झाडे लावते त्या व्यक्तिला जीवनाचा खरा अर्थ उमजलेला असतो. असेच होते माझे आजोबा. त्यांनी लावलेल्या झाडांच्या फळांचा आस्वाद घेत व त्यांनी पेरलेल्या विचारांना पुढे नेत आम्ही आज जीवन जगत आहोत.
आामच्या या वडिलोपार्जित फॅक्टरीचे कार्बन फूटप्रिंट (आपण करीत असलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या क्रियेतून आपण प्रदूषण करीत असतो, त्याचे मोजमाप करण्याचे हे एक प्रमाण आहे) नियंत्रित करून, आपण करत असलेल्या प्रदूषणाची जबाबदारी घेऊन त्याबरोबरीने आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या गरजांची पूर्तता करून, जास्तीत जास्त गराजांसाठी स्वावलंबन हा आमचा प्रथम उद्देश आहे.
आमच्या या प्रयोगभूमीमध्ये आम्ही खालील विषयांवर संशोधन, प्रयोग करीत आहोत.-
- सेंद्रिय शेती
- भूजल, पावसाचे पाणी साठवणूक
- नैसर्गिक बांधकाम
- पारंपारिक खाद्यसंस्कृती
- नवीकरणक्षम ऊर्जा
- पारंपारिक जीवनशैली
- नैसर्गिक सौंदर्यप्रमाधने इत्यादी
वरील सर्व विषयांअंतर्गत जीवनात छोटे छोटे बदल करून ही वाटचाल सुरू केली आहे. या नवीन जीवन प्रवासाची आता फक्त सुरुवात झाली आहे ,खुप समजायचे आहे ,उमजायचे आहे. नवीन शिकण्याबरोबरच खुप काही विसरायचं आहे. स्वतःवर चढलेली अनेक आवरणं काढून टाकून स्वतःच्या मूळ रुपाला पुन्हा भेटायचयं (Journey towards unlearning). आणि त्यासाठी निसर्गसाधनेपेक्षा सोप्पा मार्ग नाही. निसर्गाच्या सानिध्यात फुलता येण्यासारखं दुसर भाग्य नाही आणि त्यासाठी कायमच मी कुटुंब, वाडवडील , गुरू, सहकारी , व या ब्रह्मांडाची ऋणी राहीन आणि हाच अनुभव व परमानंद इतरांना घेता यावा यासाठी कार्य चालू ठेवीन.
शेवटी एवढंच सांगीन ,निसर्गाच्या शाळेत शिकण्यासारखं खूप आहे. इथे एकमेकांशी स्पर्धा नाही तर परस्पर सहकार्याने, एकजुटीने बांधलेले संतुलन आहे , आणि एका गोष्टीची खात्री आहे – निर्मळ, निखळ आनंद 🙂